ध्येय म्हणजे नक्की काय, माझे ध्येय काय आहे, हे प्रश्न अधिक महत्त्वाचे. ध्येय ठरवणे, त्यावर काम चालू करणे याबरोबरच ध्येय ठरविण्याआधी काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधणे अत्यावश्यक आहे. बऱ्याचदा आपण एखादी ट्रिप प्लॅन करतो, त्यासाठी पूर्वतयारीही करतो. कधी प्लॅन अपेक्षेपेक्षा चांगला अमलात आणला जातो तर कधी कमी. ध्येयाचे गणित मात्र थोडे वेगळे असते.
आपण एक स्वप्न बघतो; ज्यामध्ये आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होताना दिसू लागतात. आपण स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी एक ध्येय ठरवतो. ध्येयाची दिशा ठरली, की आपण मार्ग शोधण्याची प्रक्रिया चालू करतो. प्रत्येक मार्गामध्ये काही प्रगतिदर्शक किंवा मापदंड ठेवतो. उदाहरणार्थ : एक व्यक्ती जेव्हा व्यवसायात उतरायचे ठरवते तेव्हा काही यशस्वी होण्याचे मापदंड ठरवून वाटचाल चालू होते. हे मापदंड पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या संसाधनाचा (रिसोर्सेस) विचार येतो. काही आपल्याकडे असतात, काही नसतात. बऱ्याचदा संसाधने नाहीत म्हणून ध्येय बदलले जाते किंवा मधूनच सोडून दिले जाते. बऱ्याच अडचणी दिसताच ध्येय मध्यातूनच सोडून दिले जाते व एक प्रकारची निराशा येते. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणे आवश्यक आहे.
1)ध्येयाचा हेतू -आपण याआधी 'का?' या प्रश्नाचे महत्त्व व त्याचे फायदे जाणून घेतले. आपल्या वागण्यामागील किंवा विचारांमागील हेतूबरोबरच आपल्या ध्येयाचाही हेतू जाणून घेणे गरजेचे. आपण जे ध्येय ठरवले आहे, ते आपण का ठरवले आहे, हा पहिला प्रश्न विचारावा. कोणीतरी ठरवले आहे म्हणून, सगळे ठरवतात म्हणून, का मला खरेच काहीतरी बदलायचे आहे म्हणून? हेतू स्पष्ट झाला, की विचारात स्पष्टता येते.
2) ध्येयासाठी लागणारी मानसिकता-ध्येय ठरवताना नकारात्मक किंवा इतरांना दोष देण्याची मानसिकता असेल, तर ध्येयसुद्धा त्याचप्रमाणे तुम्हाला नकारात्मक परिणाम देते. ध्येयासाठी लागणारी योग्य मानसिकता कोणती व ती माझ्याकडे आहे का, हे तपासावे.
3) स्वतःला बदलण्याची तयारी- ध्येय ठरविल्यानंतर स्वतःमध्ये खूप बदल करावे लागतात. काही लोकांना बदल नको असतो; मग तो विचारांचा असला तरीही. स्वतःमध्ये कोणते बदल घडवायला हवेत व त्याची आपली तयारी आहे का, याची स्पष्टता आधीच घ्यावी.
4)आपल्यातील वचनबद्धता- ध्येय ठरवून धरसोड करणे योग्य नाही. आपण आपल्या ध्येयासाठी किती वचनबद्ध आहोत, हे तपासावे. तसेच, त्या वचनबद्धतेसाठी लागणारी मानसिकता व कष्ट करण्याची तयारी आपली आहे का? जरी आत्ता नसली, तरी ही तयारी आपण करू शकतो का, याची स्पष्टता व्यावी.
5)आपल्यातील संयम व सहनशीलता- आज ध्येय ठरविले म्हणजे उद्या लगेच मनाप्रमाणे होणार, असे नाही. मनाप्रमाणे झाले नाही तर आपण कसे प्रतिसाद (रिअॅक्ट) देतो, याचा विचार करा. आपल्यामध्ये संयम व सहनशीलता आहे का, हे तपासणे गरजेचे आहे.
ध्येयपूर्ती ही हिमखंडासारखी आहे. वरचे टोक सर्वांना दिसते; पण पाण्याखाली असते ती स्व-जागरूकता, स्व. परिवर्तनासाठी घेतलेले निर्णय, कष्ट व स्वतःमध्ये केलेला बदल.या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

No comments:
Post a Comment