Wednesday, May 31, 2023

कठीण प्रसंग

 सुरमई साडेसातशेला मिळते. पापलेट तेराशे रुपयांना. मटण साडेआठशे रुपयांना मिळते. आज काय घ्यावे? याचा विचार करत बसलो. तोच एका लेबरचा फोन आला.

म्हणाला, ‘साहेब जरा पैशांची नड होती.
’ मी म्हणलं ‘हा, संध्याकाळी बघू.’
‘होय साहेब’ म्हणत त्यानं फोन ठेवला.
दुपारी अठ्ठावन रुपये लीटरची दुधाची पिशवी, दीडशे रुपयांचा श्रीखंडाचा डबा आणि पासष्ट रुपयांची लोणच्याची पुडी घेऊन घरी गेलो. घरात गेल्या गेल्या बायकोने ऑनलाईन मागवलेल्या तीन साड्या दाखवल्या. प्रत्येक साडी साडेसातशे रुपयांची.
साड्या बघतानाच पुन्हा त्या लेबरचा फोन आला. म्हणाला, ‘सायेब आत्ता जमलं का भेटायला ?’ वैतागत म्हणालो, ‘अरे बाबा आत्ता लय ऊन हे. मी येतो की संध्याकाळी.
’केविलवाण्या आवाजात तो म्हणाला, ‘साहेब मी आलोय चालत चौकापर्यंत.’
मला धक्काच बसला. म्हणालो, ‘अरे तू एवढ्या उन्हात दोन किलोमीटर चालत आलाय? खुपच गरज आहे का पैशांची?’
हतबल होत म्हणाला, ‘होय साहेब.’
भुवयांचा आकडा करत म्हणालो, ‘किती पैशे पाहिजेत?’
तसा दबक्या आवाजात म्हणाला, ‘शंभर रुपये पायजे होते साहेब.’
‘थांब थांब आलो मी.’ असं म्हणत गाडी चालू करुन चौकात गेलो. मला पाहताच त्यानं काळपट तोंडावरचा घाम पुसला. आदबीनं हसला.
म्हणालो, काय रे कशाला एवढे अर्जंट पैसे पायजे होते ? सासर्‍यांना दारू पाहिजे का मेहुणा हारला जुगारात?
तसा तो उसनं हसू तोंडावर आणत म्हणाला, ‘साहेब तीन दिवस झालं हाजरीच नाय मिळाली. काल दळण टाकलय हितल्या गिरणीत. ते आणाय पैशेच नाय. रात्रीचे पाव खाल्ले पोरींनी. पण आता भुक लागली म्हणून रडाय लागल्यात. म्हणून मग तुम्हाला फोन केला.
’याची एक पोरगी दोन वर्षांची, दुसरी तीन महिन्याची.
दीर्घ उसासा घेत मी त्याच्या हातात शंभरच्या दोन नोटा टेकवल्या. तसा हसत म्हणाला, ‘एवढे नको साहेब. शंभर बास होत्यान. पगार झाल्यावर तुम्हाला वापस करीन.’
दोन्ही हात जोडून नमस्कार करत तो गिरणीच्या दिशेनं चालत निघाला.
माझ्या घरातले मासे, श्रीखंड, दुध, लोणचं सगळं बेचव करीत तो बाजरीचं पीठ आणायला निघाला होता. माझी बायको दोन अडीच हजारच्या साडया पाहून जेवढी खुश झाली, त्याहुन जास्त खुश याची बायको होणार होती, कारण तीच्या लेकरांना भाकरी मिळणार होती!
मित्रांनो, सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं, पण पैशाचं व पोटाचं सोंग नाही करता येत. आपल्यापैकी बरेच लोकं चांगल्या नोकरीला आहेत. व्यवस्थित सेटल झाले आहे, कुटुंबाच्या सर्व गरजा सर्वोपरी पूर्ण जरूर करा; पण काबाड कष्टकर्‍यांना 50-100 रूपये देताना हात आखडू नका. आज मजुरांचे दिवस वाईट आहेत. बर्‍याच लोकांवर खरोखर कठीण प्रसंग आहे.

Sunday, May 28, 2023

(नॉलेज ट्रॅव्हल्स) कांचीपुरम: मंदिरांचे कलात्मकदृष्ट्या आकर्षक शहर


कांचीपुरम हे हजारो मंदिरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. या शहराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील मंदिरे. प्रत्येक मंदिराचे नक्षीकाम, कलात्मकता-कारागिरी पाहुण्यांना आकर्षित करते. वेगावती नदीच्या काठावर वसलेल्या या शहरात निसर्ग आणि ऐतिहासिक ठिकाणांचा अनोखा संगम आहे. कांचीपुरमच्या प्रत्येक भागात मंदिर आहे. येथील मंदिरे दिसायला सारखीच आहेत, पण प्रत्येक मंदिरात एक रहस्य आहे. प्रत्येक मंदिराशी निगडीत कथाही आहे. कांचीपुरम त्याच्या खास कांचीवरम सिल्क साडीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. हे शहर एकेकाळी पल्लवांची राजधानी होती. या शहराचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील सुरेख मंदिरे. कामाक्षी अम्मा मंदिर, वरदराज मंदिर, कैलाशनाथ मंदिर, एकंबरेश्वर मंदिर, पेरुमल मंदिर यासह अनेक मंदिरे आहेत. ही मंदिरे त्यांच्या उत्कृष्ट कारागिरी आणि पोत यासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. कांचीचे कामाक्षी मंदिर पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे संपूर्ण जगातील तीन सर्वात खास पवित्र स्थानांमध्ये या मंदिराचा समावेश आहे. जिथे शक्तीची पूजा केली जाते. फेब्रुवारी-मार्चमध्ये शहरभर कामाक्षी देवीची मिरवणूक काढली जाते. हा वार्षिक उत्सव आहे. येथील कैलाशनाथ मंदिर हे कांचीच्या सर्वात जुन्या आणि सर्वोत्तम मंदिरांपैकी एक आहे. भगवान शिवाच्या या मंदिरात पल्लवांच्या काळातील उत्तम कारागिरी पाहायला मिळते. कांचीपुरममधील सर्वात मोठे मंदिर एकबरेश्वर मंदिर आहे. बारा हेक्टरमध्ये पसरलेले हे मंदिर भारतातील सर्वात जुने मंदिर मानले जाते. या मंदिराचे प्रवेशद्वार सुमारे १८८ फूट उंच आहे. हे मंदिर सुमारे दहा मजली आहे. याशिवाय १६व्या शतकात बांधलेला वेल्लोरचा किल्लाही तुम्ही येथे पाहू शकता. हा किल्ला लष्करी कलेचा अनोखा नमुना आहे. अनेक आक्रमणांचा तो साक्षीदारही आहे.  या किल्ल्यात एक छोटेसे संग्रहालय देखील आहे. वेदाथंगल आणि किरीकिरी पक्षी अभयारण्य हे देशातील सर्वोत्तम पक्षी अभयारण्यांपैकी एक आहेत. पक्ष्यांच्या 115 प्रजाती येथे पाहायला मिळतात. कांचीपुरम हे उत्सवांचे शहर म्हणूनही ओळखले जाते.येथे वर्षभर एक ना एक उत्सव सुरू असतो. वरदराज मंदिराचा ब्रह्मोत्सव हा येथील मुख्य उत्सव मानला जातो. याशिवाय गरुड सेवई, फ्लोट फेस्टिव्हल आणि कामाक्षी उत्सव हे मुख्य आहेत.

गेम टाइम

मला सांग मी कोण आहे?

या गेममध्ये एका लहान मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते. बाकीची मुलं एक एक करून त्याच्या मागे जातात आणि हात लावून काहीतरी बोलतात, आवाज बदलतात. ज्या मुलाला पट्टी बांधली आहे, त्याला विचारले जाते, मला सांग मी कोण आहे?अशा प्रकारे, हा खेळ सर्व मुलांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून खेळला जातो, जो मुलगा बरोबर नाव सांगतो तो विजेता.

( प्रेरक प्रसंग) जॉर्ज वॉशिंग्टन यांनी सांगितले वेळेचे महत्त्व


अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे अत्यंत वक्तशीर होते. वेळेचे पक्के होते. त्याची सर्व कामे वेळेवर होत.ते ठरलेल्या वेळेला उठायचे. ते ठरलेल्या वेळेत नाश्ता करायचे आणि ठरलेल्या वेळेला आपल्या कामाला सुरुवात करायचे. एकदा त्यांनी अमेरिकन काँग्रेसच्या काही नवीन सदस्यांना भोजनासाठी आमंत्रित केले आणि बरोबर रात्री आठ वाजता पोहोचावे असा निरोप दिला. खरे तर ते रोज रात्री आठ वाजताच जेवायला बसायचे, पण जॉर्जसाठी वेळ किती महत्त्वाची आहे हे नवीन सदस्यांना माहीत नव्हते. त्यांनी या बाजूकडे लक्षच दिले नाही.त्यांना पोहोचायला थोडा वेळ झाला. इकडे आठ वाजता जॉर्ज यांचे ताट करण्यात आले आणि जॉर्ज यांच्या पुढ्यात ठेवण्यात आले. त्यांनी लगेच जेवायला सुरुवात केली. त्यांचे अर्धे जेवण झाले होते, अमेरिकन काँग्रेसचे नवे सदस्य तिथे पोहोचले. जॉर्जना जेवताना पाहून त्यांना आश्चर्य वाटले.पाहुणे येण्याआधीच यजमान जेवायला बसल्याचे ते पहिल्यांदाच पाहत होते.जॉर्ज यांचे विचित्र आदरातिथ्य पाहून  ते गोंधळून गेले. सदस्यांनी याबाबत विचारले असता जॉर्ज म्हणाले, 'मी जेवायला बसलो याचे तुम्हाला आश्चर्य वाटायचं काही कारण नाही.' निमंत्रित पाहुणे आले आहेत की नाही हे माझा स्वयंपाकी कधीच पाहत नाही. तो जेवण आठ वाजता लावतो.त्याने ताट लावले की मी लगेच जेवायला सुरू करतो. आजही त्याने तेच केले. अशा प्रकारे मी प्रत्येक गोष्ट वेळेवर करतो. तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व.' एवढं बोलून जॉर्ज वॉशिंग्टन जेवणात मग्न झाले. पाहुणे शरमिंदे झाले आणि एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले.

प्रेरणा- आयुष्य घडवण्यासाठी नेहमी वेळेचा सदुपयोग करा.


Tuesday, May 2, 2023

प्रेरक प्रसंग- लाजवाब उत्तर


जगातील प्रसिद्ध अब्जाधीश आणि मोठ्या औद्योगिक समूहाचे अध्यक्ष एक गृहस्थ आपल्या साधेपणा आणि काटकसरीसाठी ओळखले जात. त्यांची साधी जीवनशैली बघून असे वाटत नाही  की ते एवढ्या मोठ्या मालमत्तेचा मालक आहेत आणि त्यांचा उद्योगक्षेत्रात किती मोठा प्रभाव आहे. त्यांच्या साधेपणाचे उदाहरण लोक नेहमीच देत असत.  मात्र त्यांच्या जीवनशैलीच्या अगदी उलट, त्यांची तीन मुले वागत.  श्रीमंतीत मनसोक्तपणे जगत असत आणि उदंडपणे खर्च करत असत. याचीही चर्चा होत असे. हा विरोधाभास पाहून शेवटी त्यांच्या एका गृहस्थाला राहवले नाही. 'साहेब, आज माझ्या मनात एक प्रश्न आला आहे, ज्याचे उत्तर मला तुमच्या तोंडून ऐकायचे आहे. अशी काटकसरी जीवनशैली अंगीकारून तुम्ही जगता हे पाहून आश्चर्य वाटते. पण मला पडलेला प्रश्न हा नाही. मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की तुमची मुलं दोन्ही हातांनी वारेमाप संपत्ती खर्च करतात आणि चैनीचे जीवन जगतात. हे असं कसं? तुमच्यात आणि तुमच्या मुलांच्या जीवनशैलीमध्ये इतके अंतर का?' 

प्रश्न ऐकून उद्योगपती क्षणभर थांबले आणि मग हसत म्हणाले, 'माझ्या मित्रा, याचं उत्तर अगदी साधं सरळ आहे. मी एका गरीब मजुराचा मुलगा आहे. आणि ती तिघंही एका श्रीमंत उद्योगपती बापाची मुलं आहेत. आता माझ्यात आणि त्यांच्यात हा फरक असणार, हे स्वाभाविक आहे.' अतिशय साधेपणाने दिलेले हे लाजवाब उत्तर ऐकून ते गृहस्थ निरुत्तर झाले.