Tuesday, October 27, 2020

विचार बदला-व्यक्तिमत्त्व सुधारेल


१) स्वतःला जाणून घ्या* *{KNOW YOUR SELF}- स्वतःला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी स्वतःमध्ये काय चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत याची एक यादी करा. त्यानंतर त्यातील चांगल्या गोष्टी प्रत्येक आठवड्याला वाढवण्याचा प्रयत्न करा. सोबत वाईट गोष्टींवर मात करीत एक प्रभावी, तजेलदार व्यक्तिमत्त्व घडवा.

२) तुमच्या वागण्या-बोलण्यात सकारात्मकता आणा {BE POSITIVE)- तुमच्या वागण्या- बोलण्यातून सकारात्मक भाव समोरच्या व्यक्तीवर प्रतित व्हायला हवा. तुम्ही नकारात्मक असाल, किंवा काही कारणांनी नाराज असाल तर समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव पडणार नाही. तो व्यक्ती तुम्हाला टाळायचा प्रयत्न करेल. अशा वेळी तुम्ही तुमचे मुद्दे त्याला पटवून सांगू शकत नाहीत.

३) तुम्हाला स्वताचे मत असू द्या (HAVE OPINION)- कोणताही प्रसंग असो तुम्हाला मत असणे अत्यंत आवश्यक आहे. मत नसलेल्या व्यक्तिला सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्थान नाही. एकदा इतरांना समजले, की तुम्हाला मत नाही तर ते तुम्हाला गृहीत धरु लागतात. यात तुमचे नुकसान होते.

४) नवीन लोकांना भेटा (EXPAND YOUR HORIZON)- असे म्हटले जाते, की दररोज तुम्ही एक माणूस जोडला पाहिजे. जर हे शक्य नसेल तर एका आठवड्यात किमान एक माणूस जोडण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा ग्रुप वाढतो. तुम्हाला नवनवीन गोष्टी कळतात, समजतात. तुमच्या ज्ञानात भर पडते.

५) वाचन करा, नवीन छंद जोपासा (READING &HOBBIES)- वाचन करणारा व्यक्ती ज्ञानी समजला जातो. कारण दररोज त्याच्या ज्ञानात भर पडत असते. नवनवीन गोष्टी तो आत्मसात करीत असतो. यामुळे तुमचा समजूतदारपणा अधिक फुलतो. आणखी लोक तुमच्याशी जोडले जातात. तसेच नवीन छंद जोपासायचा प्रयत्न करा. त्यातून तुमचा वेळ सत्कर्मी लागतो.

६) तुम्ही चांगला श्रोता व्हा (BE BEST LISTENER)- समोरचा व्यक्ती काय सांगतोय, हे तुम्ही लक्ष देऊन ऐकायला हवे. जसे तुम्ही चांगला वक्ता असावेत तसेच चांगला श्रोता असणेही महत्वाचे आहे. अन्यथा समोरचे व्यक्ती तुम्हाला ऐकून ऐकून बोर होतात. तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात.

७) तुम्ही जरा विनोदी राहा (BEST MOOD)- सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रचंड ताणतणाव शिरला आहे. शिवाय चार डोकी भेटली, की कायम गंभीर विषयांवर चर्चा केली जाते. अशा वेळी एखादा विनोद तुम्हाला वेगळे परिमाण देऊन जातो. पण उपस्थित असलेल्या लोकांमध्ये तुम्ही केलेला विनोद किती साजेशसा, समंजस आहे हे आधी तपासून घ्या. नाहीतर हसे करुन घ्याल.

८) इतरांचा आदर राखा-(BEHAVIOUR)- भारतात आदर या शब्दाला प्रचंड महत्त्व आहे. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला आदर दिला, सन्मान दाखवला तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी झळाळी झळळते. त्याच्या मनातील तुमचे स्थान अधिक बळकट होते. त्याचा तुम्हाला भविष्यात लाभ होतो.

९) देहबोली वर भर द्या(BODY LANGUAGE)- समोरच्या व्यक्तिशी संवाद साधताना, बोलताना अगदी कंम्फर्टेबल राहा. तुमच्या बॉडिलॅंग्वेजवर भर द्या. त्यातून तुम्ही प्रभावी संभाषण साधू शकता. आपले मुद्दे पटवून देऊ शकता. भाषण करतानाही बॉडी लॅंग्वेजला खूप महत्त्व आहे.

१०) ड्रेसिंग सेन्स सुधारा( PERSONALITY)-एखाद्या इव्हेंटनुसार आपले ड्रेसिंग ठेवा. ऑफिसला जाताना साजेशसे कपडे घाला. रात्रीची पार्टी असेल तर पार्टी लुकमध्ये जरा मॉर्डन दिसण्याचा प्रयत्न करा. कलिग्जसोबत बाहेर फिरायला जाणार असाल तर कॅज्युअल्स घाला.

११) आत्मपरिक्षण करा (INNER VOICE)- आत्मपरिक्षण अत्यंत आवश्यक आहे. त्यातून तुमच्या चांगल्या वाईट बाबी समोर येत असतात. तुम्ही खरंच चुकताय की बरोबर आहात, हे तुम्हाला समजून येते. तुम्ही मार्गक्रमण करीत असलेला मार्ग योग्य की दुसरा मार्ग पकडायला हवा, हेही समजते.

१२) स्वतःवर विश्वास ठेवा {SELF CONFIDENC)- आत्मविश्वास असायलाच हवा. आपल्या गुणांची आपल्याला पारख हवीच. पण ओव्हर कॉन्फिडन्ट राहू नका. त्यात तुमचे नुकसान असते. पण स्वतःला दुर्लक्षितही करु नका. अन्यथा तुमच्यात गट्स असतानाही तुम्ही स्पर्धेच्या बाहेर फेकले जाता. सर्वोत्तम राहण्याची क्षमता असतानाही मागच्या रांगेत उभे राहता. तेव्हा बी कॉन्फिडन्ट. जगावर मात करा.

Thursday, October 22, 2020

अपयश देतो नवा दृष्टिकोन


प्रत्येकाला कधी ना कधी आयुष्यात अपयशाला तोंड द्यावं लागतच. परंतु, काही लोक आपल्या या अपयशाला आपली पूर्ण हार समजून हतबल होऊन जातात. पण काही लोक या अपयशातून धडा घेऊन मार्गक्रमण करीत राहतात आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहचतात. याचाच अर्थ या अपयशातूनच काही महत्त्वाचा धडा घेऊन आपण आपलं आयुष्य आणखी नेटाने पुढं नेऊ शकतो. जेव्हा आपण अपयशी होतो,तेव्हा त्यातून काहीतरी नवं शिकतो. चुका शोधतो. आणि मग त्यातून शिकतो. अशाच प्रकारे जीवन,प्रेम,धन, नाती, माणसं आणि व्यापार यांच्याबाबतीत आपला  पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. आयुष्यात कशाला महत्त्व द्यायचं आणि कशाला किंवा कुणाला दूर ठेवायचं, याची जाण येते. अपयशामुळे नव्या गोष्टी शिकतो. नव्या योजना बनवतो आणि नवे समझोतेही करतो. प्रत्येक अपयशानंतर आपण आणखी तावून-सुलाखून निघतो. खरं तर ही शिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे. जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला आता आताच अपयश आलं असेल तर तुम्हाला लगेच त्याचा काही लाभ दिसणार नाही. पण याचे महत्त्व तुम्हाला काही काळ उलटल्यानंतर कळेल.

अपयशामुळे आपल्याला चांगले अनुभव मिळतात- या अपयशामुळे पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा मिळतो तो म्हणजे अनुभव.जेव्हा आपण कुठलेही काम करण्यात अपयशी ठरतो, तेव्हा आपल्याला त्याचा अनुभव मिळतो-त्यामुळे जीवनाचा अर्थ समजून घ्यायला मदत मिळते. खरं सांगायचं तर जो अनुभव तुम्हाला तुमच्या अपयशाने मिळतो, त्याच्या इतके कुठलेच मोल नसते.

अपयशाने वाढतो आत्मविश्वास- जेव्हा आपण अपयश मागे सोडून पुढे यशाच्या दिशेने जात असतो,तेव्हा आपला आत्मविश्वासदेखील वाढत जातो. पुन्हा पुन्हा अशा परिस्थितीचा सामना केल्यानंतर कुठल्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडताना आत्मविश्वासही द्विगुणीत होतो.

अपयशाने तुमच्या जीवनाचा प्राधान्यक्रम बदलतो- एक म्हण आहे, अपयश तुम्हाला आयुष्यातून उठवते किंवा आयुष्य बनवते. या गोष्टीचं प्रमाण म्हणजे आज जे सगळे  यशस्वी लोक यशाच्या शिखरावर आहेत, त्यांनी या मार्गावरून जाताना कितीदा तरी अपयशाचे धक्के खाल्ले आहेत. पण ही यशस्वी माणसं या धक्क्यातून सावरली आहेत, उठून उभी राहिली आहेत आणि पुढे चालत राहिली आहेत. यानंतरच ते यशाच्या शिखरावर पोहचले आहेत. आज ती यशाची चव चाखत आहेत. ज्यावेळेला आपण आपल्या कामात अयशस्वी होतो, त्यावेळेला आपण आपल्या जीवनाच्या प्राथमिकतेवर विचार करायला लागतो. कशाला प्राधान्य द्यायचं या गोष्टी विचाराने ठरतात. आणि मग गरजेनुसार आपण त्यात बदल करतो. हे का करतो? कारण लवकरात लवकर आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचता यावं म्हणून...!-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली