Monday, August 31, 2020

'ययाति': वि. स.खांडेकर


'ययाति' ही वि. स. खांडेकर लिखित प्रसिद्ध कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश टाकते. जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो त्या वेळेस त्याला हे जीवनातील अंतिम तथ्य नव्हे ह्याची जाणीव होते. इ.स. १९७२ साली वि.स. खांडेकरांना ययाति कादंबरीसाठी भारतातील साहित्यासाठीच्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मराठीतला अत्यंत अमुल्य ठेवा. प्रेम म्हणजे नक्की काय हे याचे नितांत सुंदर वर्णन आहे. शर्मिष्ठेचे निष्पाप प्रेम अप्रतिम आहे. मानवाच्या मनातील भौतिक सुखांच्या ओढीचे प्रतिक म्हणजेच ययाती. ययाती, देवयानी, शर्मिष्ठा ह्यांन च मनोगत वाचतांना आपण खरच गुंग होऊन जातो , त्या पात्रात हरवून जातो.

ययातीतीची काही सुंदर वाक्य आहेत ते येथे देत आहे.


● या जगात जन्माला येण्याचा एकच मार्ग आहे, तसं मरणाचं नाही...

मृत्यु अनेक वाटांनी येतो! कुठून ही येतो तो!

●आत्मप्रेम... या जगात जो तो आपापल्याकारिता जगतो हेच खरे. 

वृक्षवेलीची मूळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात.....

●याला जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रिती म्हणते, तर कधी मैत्री........पण खरोखरच हे आत्मप्रेम असते....

आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ भरलेला आहे,

असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते.........

●अपहार...

ते फूल पाहून माझ्या डोळयांना जे सुख होईल ते सुख प्रत्येक दिवशी मी घेणार आहे. 

ते फार चांगलं उमललं म्हणजे वेलीजवळ जाउन त्याचा वासही घेणार आहे मी. 

पण ते तोडणार मात्र नाही. आज वासासाठी एक फूल खुडलं तर उद्या तेवढ्याच सुखासाठी फूलामागून फूलं खुडाविशी वाटतील मला. 

मग दूस-यांच्या फूलांचा अपहार करण्याची इच्छा माझ्या मनात प्रबळ होईल........

अपहारासारखा अधर्म नाही..........

●सत्य...

लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे. सत्याचा नाही. सत्य हे नग्न असते. 

नुकत्याच जन्मलेल्या बालाकाप्रमाने असते ते ! ते तसे असावेच लागते..........

●सुख...

या जगात सुख लूटण्याचा काळ एकच असतो-----ते मिळत असते तेव्हा.......!

●प्रिती...

प्रिती ही कधी उमलणा-या फूलासारखी हसते तर कधी उफाळणा-या ज्व़ाळेसारखी दिसते. 

ती कधी चांदणी होते, तर कधी वीज होते. ती कधी हरिणीचे रूप घेते, तर कधी नागीणीचे... ती कधी जीव देते, तर कधी जीव घेते.........!!

●जीवन...

जीवन नेहमीच अपूर्ण असतं. नी असं ते असण्यातच त्याची गोडी साठवलेली आहे..

●प्रेम..

प्रेम माणसाला स्वत:च्या पलीकडे पाहायची शक्ती देतं. ते प्रेम कुणावरही असो, 

ते कशावरही जड़लेलं असो. मात्र ते खरंखुरं प्रेम असायला हवं! ते स्वार्थी, लोभी, किंवा फसवं असता कामा नये. 

●खरं प्रेम नेहमीच नि:स्वार्थी असतं, निरपेक्ष असतं... मग ते फूलावरलं असो, प्राण्यावरलं असो, सृष्टिसौंदर्यावरलं असो, आई-बापावरलं असो, 

प्रियकर-प्रेयसी यांच्यावरलं असो, कुल, शांति, राष्ट्र यांच्यापैकी कुणावरलंही असो. नि:स्वार्थी, निरपेक्ष, 

निरहंकारी प्रेम हीच माणसाच्या आत्म्याच्या विकासाची पहिली पायरी असते...........

असलं प्रेम केवळ मनुष्य करू शकतो! 

● जग माणसाच्या दयेवर चालत नाही.

● ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं. 

माणुस केवळ प्रेमावर जगुच शकत नाही.तो इतरांचा परभव करुन जगतो.

● मनुष्य या जगात जी धडपड करतो ती भोगासाठी ! ! 

त्यागाची पुराणं देवळातच ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही,ते रणांगन आहे.

● मुद्र शिंपल्यात घालून कधी कुणाला दाखविता येईल का ? 

● फुलाचे चित्र काढून कधी त्याचा सुगंध घेता येईल का ?  प्रीतीची अनुभूती सुद्धा अशीच आहे.

● दैव हे मोठ क्रूर मांजर आहे माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळविण्यात त्याला विलक्षण आनंद होत असतो.

● लज्जा सौंदर्याचा अलंकार आहे. सत्याचा नाही, सत्य हे नग्न असतं.

● माणसांन उपभोग घेऊ नये अशी जर देवाची इच्छा असती, तर त्यानं शरीर दिलच नसतं, पण केवळ उपभोग म्हणजे जीवन नव्हे.

★ खांडेकर यांना ययाती आणि त्यांच्या रूपक कथेच्या पलीकडे पाहिलं पाहिजे.वि.स खांडेकर हे खरोखरच एक मराठीचे महान लेखक होते म्हणूनच त्यांच्या साहित्याला प्रदेश आणि प्रांत आणि भाषेची सिमा बंधन नव्हत ते साहित्य भारतात, परदेशात ही वाचलं गेलं.

म्हणून त्यांचं साहित्य केवळ मराठीत वाचलं जात नाही, तर समग्र भारतीय भाषांत त्याची भाषांतरे आढळतात. सिंधी, पंजाबी, बंगाली, कन्नड, मल्याळम्, तामिळ, गुजराती, हिंदी, इंग्रजी किती भाषा सांगाव्या, त्यांचं साहित्य भारतभर वाचलं जातं. अभ्यासल जात विशेष म्हणजे, त्या भाषेतही भाषांतरांच्या आवृत्त्या आजही प्रकाशित होतात. तामिळ, गुजरातीत तर खांडेकर यांच्या भाषेतील लेखक मानले जातात. तामिळ व मराठी वाचकांचा कौल घेतला तर तामिळ भाषिक मतं खांडेकरांना अधिक मिळतील.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराय यांना खांडेकरांच्या कादंबऱ्याचें उतारेच्या उतारे पाठ होते. त्यांच्या ‘द्रविड कळघम’, ‘द्रविड मुनेत्र कळघम’ पक्षाची चळवळ खांडेकर विचारांवर उभी राहिली आहे. तामिळ साहित्य इतिहासात ‘खांडेकर साहित्य’ अध्याय म्हणून अभ्यासलं जातं. खांडेकरांचे तामिळ अनुवादक कां. श्री. श्रीनिवासाचार्य तर तामिळमध्ये लेखक म्हणून ओळखले जातात, ते केवळ खांडेकरांच्या भाषांतरामुळे.  श्रीलंका, मलेशिया, रशियामध्ये खांडेकर साहित्यावर संशोधन, समीक्षा आहे. रशियात ‘ययाति’ भाषांतरित झाली आहे. देश, प्रदेशाच्या सीमा ओलांडणारं खांडेकरी साहित्य खरोखर अजरामर आहे. पिढ्या घडविण्याचे कार्य करणा-या मोजक्या साहित्यिकांत वि. स. खांडेकरांचा समावेश होतो, तो या योगदानामुळे. त्यांनी आपल्या साहित्यातून रामायण, महाभारत, पंचतंत्र, पुराण इत्यादींमधील मिथकांचा द्रष्टा उपयोग करून घेतला. इतकेच नाही, तर त्याचा समकालीन परिस्थितीशी समन्वय लावून त्याचा नवा अर्थ सांगितला. 'ययाति' कादंबरी हे त्याचे बोलके उदाहरण होय.

Thursday, August 20, 2020

सात किंमती रत्न

या जीवनात जगत असताना सात रत्ने आपल्याजवळ बाळगल्यास तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. कशाचं दुःख वाटणार नाही. त्यामुळे या रत्नांना जवळ बाळगा. यातले पहिले  रत्न आहे माफी. तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलले, तरी ते मनाला लावून न घेता, मोठ्या मनाने 'माफ' करा.

दुसरे  रत्न  आहे विसरा. दुसऱ्यावर केलेले उपकार विसरा. फळाची अपेक्षा करु नका. 'निःस्वार्थ' भावना ठेवा. तिसरे  रत्न-विश्वास. नेहमी 'स्वकष्ट' आणि 'ईश्वरावर' अतूट विश्वास ठेवा. हीच तुमच्या यशाची पावती असेल.

चौथे  रत्न आहे नातं. समोरच्याच्या मनाची काळजी आपण आपल्या मनापेक्षा जास्त घेतल्यावर जे निर्माण होत ते नातं नात्याला जपा, नात्यांना तडा जावू देवू नका. पाचवे रत्न म्हणजे दान. नेहमी सढळ हाताने दान करा, दान केल्याने धन कमी होत नाही उलट दान केल्याने मिळतो मान आपले मनच आपल्याला दानशूर ही पदवी बहाल करतं

सहावे  रत्न  आहे आरोग्य. दररोज व्यायाम करा, योगासने करा, झुंबा करा, चालणे ठेवा आणि आपले जीवन निरोगी ठेवा. आणि  सातवे रत्न  आहे वैराग्य. नेहमी लक्षात ठेवा की, 'जन्म' आणि 'मरण' कधीच कुणालाच चुकलेले नाही. 'जन्म' घेतला म्हणजे 'मृत्यु' अटळ आहे. वर्तमानात जगा. कोणत्याही गोष्टींचे दुःख कुरवाळित  बसू  नका. 'जीवन' खूप सुंदर आहे, आनंदाने जगा..

माणूस जसा बदलत चालला आहे,तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे. निसर्गाची ताकद  आहे बघा निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा, संपत्ती, गाडी,बंगला,सोने, श्रीमंती याहीपेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे.

Tuesday, August 18, 2020

नैराश्य आलं असेल तर हे वाचा

अहमदनगर येथील एक समुपदेशक आहेत अनिल उदावंत. त्यांचा एक किस्सा व्हॉटस अप वर वाचला होता. हा किस्सा वाचला की, नक्कीच तुमचे विचार बदलतील. नैराश्य, डिप्रेशन कमी होईल. 'प्रचंड निराशेनं ग्रासल्यावर म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यावर ५३ वर्ष वयाच्या रमेशने एका समुपदेशकाची भेट घ्यायचं ठरवलं. त्यानं शहरातील एका नामांकित समुपदेशकांना फोन करुन त्यांची अपॉईन्टमेन्ट घेतली. ठरलेल्या दिवशी दिलेल्या वेळेतच रमेश समुपदेशकांकडे पोहोचला. समुपदेशकांना भेटून त्यानं आपली बेहाल अवस्था वर्णन केली आणि "मी सध्या प्रचंड निराशेनं ग्रासलो आहे, त्रासलो आहे" असं स्पष्टच सांगीतलं.

रमेशचं बोलणं समुपदेशकांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं होतं.  

समुपदेशकांचे आपल्या विशिष्ठ शैलीतले समुपदेशन सुरु झाले. त्यांनी सर्वप्रथम रमेशच्या सोबत आलेल्या त्याच्या पत्नीला बाहेर बसायला सांगीतले. आता त्या केबिनमध्ये समुपदेशक आणि रमेश असे दोघेच बसले होते. समुपदेशकांनी दोन-चार हलकेफुलके प्रश्न विचारुन रमेशचा ताण हलका करण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्तरादाखल रमेशची रडकथा सुरु झाली. 

रमेश सांगत होता - " मी खूप त्रासलो आहे चिंतेनं माझ्या काळजावर प्रचंड दाब आला आहे नोकरीतल्या कामाचं टेन्शन, मुलांच्या शिक्षणाची काळजी, त्यांना चांगली नोकरी मिळेल की नाही याची चिंता, बायकोची हौस मौज, घरासाठी घेतलेलं कर्ज, गाडीचे हप्ते, माझं आजारपण, पाहुण्यांची वर्दळ... "

रमेश पुढं बोलतच होता - "या सगळ्या काळज्यांमुळे मी सैरभैर झालोय. कशातच मन लागत नाही. लोकांना वाटतंय माझं छान टुमटुमीत चाललंय. पण माझं मलाच माहित.. मी हे सगळं कसं करतोय ते. रात्री नीट झोप लागत नाही. जेवायला बसलो की अन्नावरची वासना उडून जाते. का कुणास ठाऊक, पण माझं काही खरं नाहीं. मी प्रचंड निराश झालोय!" असं सांगत रमेशनं आपलं सारं दुखणं नि:संकोचपणे मांडलं होतं.

रमेशचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतानाच समुपदेशकाच्या डोक्यात विचारचक्र सुरु होतं.

रमेशचं बोलणं थांबल्यावर समुपदेशकांनी रमेशला विचारलं- 

"तुमचं प्राथमिक शिक्षण कोणत्या शाळेत झालं?"

रमेशनं त्याच्या प्राथमिक शाळेचं नाव सांगीतलं. रमेशला हा प्रश्न अप्रस्तुत वाटल्यानं त्याचा चेहरा त्रासिक झाला होता. समुपदेशकांनी मात्र त्याच्या त्रासिक चेहऱ्याकडे दुर्लक्ष करुन हलकेच हसत म्हटलं- 

"तुम्हाला त्या शाळेत एकदा जावं लागेल. जमेल का तुम्हाला त्या शाळेत जायला?" 

रमेश हे ऐकून आणखी त्रासला होता. परंतु तरीही तो म्हणाला-

"मला त्या शाळेत जायला जमेल, पण त्यानं माझा प्रश्न सुटणार आहे का? कशासाठी जायचं मी त्या शाळेत?"

समुपदेशक म्हणाले- "त्या शाळेत तुम्ही चौथीच्या वर्गात शिकत असताना तुमच्या वर्गात कोण कोण विद्यार्थी होते, त्यांची सर्वांची नावं तिथल्या एका रजिस्टरमध्ये लिहीलेली असतील. त्या रजिस्टरची एक झेरॉक्स कॉपी हवी आहे. पुढच्या वेळी माझ्याकडे येताना ती तुम्ही सोबत घेवून यायची आहे."

रमेशला या त्रासिक वाटणाऱ्या गोष्टीचीही थोडी गंमत वाटली आणि त्यानं शाळेतून अशी यादी आणायला होकार दिला.

रमेशने समुपदेशकांनी सांगीतल्याप्रमाणे त्यांच्या शाळेत जाऊन चौथीच्या वर्गाच्या रजिस्टरमधील सर्व विद्यार्थ्यांच्या नावांची यादी आणून समुपदेशकांकडे सुपूर्द केली. 

यादीवरुन नजर फिरवित समुपदेशक रमेशला म्हणाले- "हे सर्व जण तुमच्या सोबत शिकत होते. आता तुम्ही एकेक करुन सर्वांना भेटा, त्यांचं सध्या काय चाललंय याची माहिती मिळवा. ही तुम्हाला मिळालेली माहिती एका स्वतंत्र वहीमध्ये लिहा आणि  एक महिन्याच्या आत ती वही मला दाखवायला घेवून या."

रमेशने यादी परत हातात घेतली. त्यात सुमारे १५० नावे होती. या सर्वांना भेटण्यासाठी रमेशने रात्रीचा दिवस केला. खूप फिरुन सुद्धा रमेशला त्यातील फक्त १२० जणांची भेट घेणं शक्य झाली होती. 

महिन्याभराने या भेटीतून मिळालेल्या माहितीचा सर्व तपशील घेवून रमेश समुपदेशकांकडे गेला. सोबतची वही समुपदेशकांच्या हाती दिली. समुपदेशकांनी वहीतील माहिती वरुन नजर फिरवली. त्यांचा हेतू साध्य झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता!

समुपदेशकांनी ती वही पुन्हा रमेशच्या हाती सोपवत त्या माहितीचे मोठ्या आवाजात वाचन करायला सांगीतले. 

रमेशने त्या वहीतील माहितीचे वाचन केले. १२० जणांना भेटून रमेशने मिळविलेल्या माहितीचा साधारण तपशील खालीलप्रमाणे होता -

१) १९ जणांचा मृत्यू झालेला होता.

२) ७ मुली विधवा झालेल्या होत्या.

३) १३ जण घटस्फोटीत होते.

४) १५ मुले दारुच्या व्यसनात पूर्ण अडकली होती.

५) ५ मुले विधूर झाली होती.

६) ४ जणांना मुल-बाळ झालेलं नसल्यानं त्यांच्या दवाखान्याच्या / बाबा -बुवांच्याकडे चकरा सुरु होत्या.

७) २३ जणांना मधुमेहाचा आजार जडला होता.

८) ६ जणांना वेगवेगळ्या कॅन्सरने पछाडले होते.

९) ९ जणांच्या मुलाबाळांचं शिक्षण अर्ध्यातच सुटलं होतं.

१०) ४ जणांना काहीतरी अपघात होऊन अपंगत्व आलेलं होतं.

११) २ जण असे होते की ज्यांना त्यांची मुलं सांभाळीत नाहीत. ते निराधार झाले आहेत.

१२) १ जणाची मानसिक स्थिती बिघडून त्याला वेड लागले होते.

१३) ३ जण इतके गरिब होते की त्यांना रोजच्या खाण्यापिण्याचीही भ्रांत होती.

१४) ५ जण खूप श्रीमंत आणि त्यामूळेच खूप गर्विष्ठ झाले होते.

१६) १ जण आर्थिकदृष्टया सक्षम नसल्याने त्याचे अद्यापही लग्न झाले नव्हते.

१७) १ जण असा होता की ज्याची तीन लग्ने होऊनही तो समाधानी नव्हता.

१८) २ जणांना वेगवेगळ्या गुन्ह्यात तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. ते जेलमध्येच होते.

ही माहिती मोठया आवाजात वाचून पूर्ण झाल्यावर रमेशने समुपदेशकांकडे नजर टाकली. हलकेच स्मित करीत समुपदेशकांनी रमेशला विचारले- " आता सध्या तुमची निराशा काय म्हणतेय?"

समुपदेशकांच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं? यासाठी रमेश स्वतःशी विचार करु लागला-

"मी नको त्या गोष्टींचा नको तितका बाऊ करतोय. त्यामुळेच आपल्याला नैराश्याने ग्रासलं आहे. खरंतर माझी परिस्थिती इतर सगळ्यांच्या तुलनेत खूप चांगली आहे. माझ्या हाती चांगल्या पगाराची नोकरी आहे. मी आरोग्याच्या दृष्टीनं अगदी ठणठणीत आहे. माझे सारे कुटूंबिय आनंदी आहेत. माझी मुलं हुषार आहेत. त्यांना शिक्षणात आणि अभ्यासातही चांगली रुचि आहे. मी इतरांपेक्षा नक्कीच सुखी आहे."

आपण आजवर चुकीच्या पध्दतीने विचार करुन, चूकीचे वागून आपल्याच सुखाचा चोळामोळा केला आहे! हे लक्षात आल्यानं रमेश खजील झाला होता!

तुम्हालाही असं नैराश्य आलं आहे का? तुम्हाला डिप्रेशन आलंय का?

जर तुम्हालाही निराशाग्रस्त वाटत असेल, तुम्ही डिप्रेस्ड झाला असाल तर तुम्हीही एकदा तुमच्या शाळेत जाऊन यायला हवं. रमेशनं केलेला प्रयोग एकदा तुम्हीही करुन पहायला हवा.'


Thursday, August 13, 2020

वयाच्या 45/ 55 / 65 नंतरचा काळ आनंदात घालवायचा असेल तर...

वयाच्या 45 नंतरचा काळ आनंदात घालवायचा असेल तर काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. यासाठी 12 नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना अनेक मंडळींची मदत झाली आहे. यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील. हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, लक्षात ठेवावेत व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. 

1) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट, मेहेनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. है पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याएवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते.

(धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्य- दिव्य, आकर्षक किंवा ‘फुल फ्रूफ’ असो. त्यामूळे कदाचीत तुमच्या समस्या व टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शन विरहीत व शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामूळे या वयात गुंतवणुक करू नये.)

2)  तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजीबात चिंता करू नका. तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला मुळीच कमीपणा मानू नका. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतकी वर्षे संभाळले, त्यांना अन्न-वस्त्र-निवारा दिलात. चांगले शिक्षण दिलेत. आता त्यांना लागणारे पैसे त्यांना कमवू द्यात.

3) आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेत चला. यासाठी झेपेल एवढाच व्यायाम नियमीतपणे करा. उगीचच्या उगीच जिमला जाणे, तासंतास पळणे, तासंतास योगासने करणे किंवा प्राणायाम करणे यासाखे अघोरी व्यायाम करू नका. चांगले खा, भरपूर झोप काढा. नियमीतपणे वैद्यकीय तपासणी करून घेत चला व आपल्या डॉक्टरच्या संपर्कात रहा. तसेच आपल्याला लागणारी नियमीत औषधे सतत जवळ बाळगत चला. कारण नसताना डॉक्टर्सच्या जाळ्यात अडकू नका किंवा औषधांच्या व्यसनात गुरफटू नका.

4) तुमच्या जोडीदाराची काळजी घेत चला. त्यांच्यासाठी उत्तमोत्तम वस्तु व प्रेझेन्ट्स आणत जा. कारण एक ना एक दिवस तुमच्यातील एकजण आधी जाणार आहे याची जाणीव ठेवा. हाती असलेला पैसा दोघांनी मिळून इन्जॉय करा. कारण एकट्याने पैसा इन्जॉय करणे कठीण असते.

5) छोट्या छोट्या गोष्टींवरून उगीच डोक्याला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आयुष्यात पुष्कळ उन्हाळे पावसाळे बघीतले आहेत. तुमच्या मनात काही सुखी आठवणी आहेत तर काही दुःखी, मनाला यातना देणार्याा आठवणी पण आहेत. पण लक्षात ठेवा, तुमचा ‘आज’ सर्वात महत्वाचा आहे. त्यामूळे भूतकाळातील वाईट आठवणींमूळे, तसेच भविष्यकाळातील चिंतेमुळे तुमचा ‘आज’ खराब होऊ देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी आपोआप सरळ होतील.

6) तुमचे वय काहिही असो, प्रेम करायला शिका. तुमचा जोडीदार, तुमचे कुटुंब, तुमचे शेजारी, तुमचे आयुष्य यावर प्रेम करायला लागा. लक्षात ठेवा जोपर्यंत माणसाची बुद्धी शाबूत असते व मनात प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस वृद्ध होत नसतो.

7) स्वतःविषयी अभीमान बाळगा. तो अंतरबाह्य असुदे. वेळच्यावेळी कटींग सलूनमध्ये जाऊन केस कापून घ्या. डेन्टिस्टकडे जा. आवडत्या पावडरी, पर्फ्युम्स वापरायला संकोच करू नका. कपडे निटनेटके ठेवा. बाहेरून तुम्ही जितके चांगले रहाल तेवढे आतून समाधानी असाल.

8) तुम्हाला फॅशन करायची असेल तर खुषाल करा. वृद्ध मंडळींसाठी नवीन फॅशन्स काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही थोडे फॅशनेबल राहिलात तर तरुणांना सुद्धा आवडाल.

9) आपले ज्ञान व माहिती अद्ययावत ठेवा. वर्तमानपत्रे वाचत जा. टि. व्ही. वरील बातम्या बघत जा. सोशल नेटवर्कींग साइटचे सभासद व्हा. तुम्हाला कदाचीत तुमचे जुने मित्र किंवा मैत्रीणी परत भेटतील. कनेक्टेड रहा. यामधे पण मोठा आनंद आहे.

10) तरुणांचा व त्यांच्या मतांचा आदर करा. कदाचीत तुमच्या व त्यांच्या विचारात फरक असू शकेल. पण तेच उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सल्ला द्या, मार्गदर्शन करा आणि ते सुद्धा त्यांनी मागीतले तरच. उगीच च्या उगीच त्यांचेवर टिका करू नका किंवा त्यांचे दोष काढत बसू नका. कालच्या शहाणपणाला आजच्या जगातही तेवढेच महत्व आहे याची त्यांना जाणीव करून देत चला.

11) ‘आमच्या वेळी असे होते, आमच्यावेळी तसे होते’ असे शब्दप्रयोग अजीबात करू नका. कारण तुमची वेळ आत्ताची आहे, कालची नव्हे. त्यामूळे काल काय घडले हे सतत तोंडावर फेकून मारत जाऊ नका. आत्ताचे आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा विचार करा.

12) बहुतेक मंडळी वृद्धत्व आले म्हणून रडत बसतात. फारच थोडी मंडळी वृद्धत्वाचा आनंदाने स्विकार करतात. आयुष्य फार छोटे आहे. त्यामूळे असे करू नका. नेहमी आनंदी लोकांच्या संगतीत रहाण्याचा प्रयत्न करा. त्यामूळे तुम्हालाही आनंद वाटेल. निराश, दुःखी, रड्या लोकांपासून दूर रहा. लक्षात ठेवा दुःखी व रडी माणसे कोणालाच आवडत नसतात. आनंदी व चिअरफूल माणसेच लोकांना आवडत असतात.

सुरुवात छोटी करा, पण...

ज्याला लढायचे माहीतच नाही, त्याची जीवनाच्या लढाईत माती झाल्याशिवाय रहात नाही.  छत्रपती शिवरायांनी संभाजी महाराजांना वयाच्या आठव्या वर्षी आग्र्याच्या भेटीसाठी बरोबर नेले आणि येताना  मथुरेत ठेवून स्वतः राजगडावर आले . कल्पना करा त्यावेळी संभाजीमहाराज  एकुलते एक पुत्र होते, संपर्काचे कोणतेही साधन नसताना हजारो मैल दूर आपल्या पुत्राला शत्रूच्या मुलखात सोडण्यसाठी किती मोठे धाडस करावे लागले असेल ? औरंगजेबासारख्या वादळाला तोंड द्यायचे असेल तर सरावसुध्दा त्याच तोडीचा अगदी लहानपणापासून करावा लागला आहे .आज जवळपास सगळीच मुले व मुली एकुलत्या एक आहेत, त्यांना संकटाची साधी झळही आपण बसू देत नाही. कदाचित आपण त्यांचे नुकसान करत आहोत, त्यांना पंगु बनवत आहोत. पोटाची भूक माणसाला व्यवहार शिकवते आणि किर्तीची भूक माणसाला झगडणे शिकवते.  अन्नाची चव पदार्थात नसते तर ती भूकेत असते. भूक लागायच्या आधीच अन्न मिळाले तर त्या अन्नाची किंमत कधीच कळत नाही. नेमके तेच आज आपण करत आहोत.किर्तीची भूक निर्माण करावी लागते , त्यासाठी उत्तुंग धेय्य समोर असावे लागते, 

अमाप लोकप्रियता आणि कर्तुत्वाचा हिमालय उभी केलेली माणसे सतत दृष्टीसमोर असावी लागतात.

तरच ही भूक निर्माण होते . आपल्याला पोटापुरते आहे काही काळजी करायचे कारण नाही. ही विचारधारा आत्मविश्वासाने सळसळत्या तारूण्यात झेप घेऊ पाहणाऱ्या तरूणाईच्या पायातील बेडी आहे . ज्या पालकांनी ही बेडी आपल्या मुलांच्या पायात घातली, त्यांना लढणे माहीत होत नाही आणि वादळी संकटात अशी मुले तग धरत नाहीत .शहाजीराजे आणि मॉंसाहेब जिजाऊ यांना काय कमी होते ?  त्यांनी जर शिवरायांच्या पायात  ही बेडी टाकली असती तर काय झाले असते ?  ज्यांनी आपल्या मुलांच्या पायात अशा बेड्या टाकल्या , त्यांना  शिवरायांच्या संरक्षणाची गरज भासली, मॉंसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी ही बेडी तोडली, त्यांच्या पुत्राने इतिहासात सुवर्णपाने लिहायला भाग पाडले.जीवनाची खरी पुंजी ही  झगडण्याची आणि झुंजण्याची कला आहे, तीच वारसाहक्काने मुलांना द्यायला हवी.

आपल्या कुलदीपकाचा प्रकाश हवा असेल तर ही कला म्हणजे त्याच्या चमकण्याचे इंधन आहे, हे कधीच विसरू नका. आज कोणतेच क्षेत्र सुरक्षित नाही ,  तुम्ही कितीही तयारी करून ठेवा , जो झुंजतोय ,लढतोय तोच टिकणार आहे. हात बांधून उभा राहणारा  दुसऱ्याची शिकार होणार आहे . 

मॉंसाहेब जिजाऊ शिवरायांना आशिर्वाद देताना दररोज म्हणायच्या, राजे दौलत चढती करा ! हे झगडायला शिकवणे आहे. चारशे वर्षापूर्वी त्या मातेला कळाले होते, बापाच्या कमाईवर जगणाऱ्या पोराला समाज किंमत देणार नाही . आजही आम्हाला हे समजलेले नाही, मुले लग्नाला आली तरी आम्ही त्यांची काळजी करत आहोत आणि त्यापेक्षाही वाईट म्हणजे त्यांची काळजी घेत आहोत.

     स्वतःला आवडणारा रस्ता निवडा,मार्ग निश्चित करा.ध्येय निश्चित करा.मग हा निवडलेला रस्ताच जर इनामदारीचा व सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही. भले कोणी सोबत असो वा नसो.फक्त चालण्यात सातत्य हवे. सुरुवात नेहमीच छोटी करावी पण शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे,आयुष्यात  सावकाश चाला काही हरकत नाही, पण चालताना अस चालायचं की आपल्या कर्तृत्वाची,आणि  मनमिळावू स्वभावाची, आत्मिक समाधान लाभलेल्या मनाची, आणि दैदिप्यमान यशाची सोन पावले सदैव  मागे उमटली पाहिजे. (संकलन)