Thursday, October 22, 2020

अपयश देतो नवा दृष्टिकोन


प्रत्येकाला कधी ना कधी आयुष्यात अपयशाला तोंड द्यावं लागतच. परंतु, काही लोक आपल्या या अपयशाला आपली पूर्ण हार समजून हतबल होऊन जातात. पण काही लोक या अपयशातून धडा घेऊन मार्गक्रमण करीत राहतात आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहचतात. याचाच अर्थ या अपयशातूनच काही महत्त्वाचा धडा घेऊन आपण आपलं आयुष्य आणखी नेटाने पुढं नेऊ शकतो. जेव्हा आपण अपयशी होतो,तेव्हा त्यातून काहीतरी नवं शिकतो. चुका शोधतो. आणि मग त्यातून शिकतो. अशाच प्रकारे जीवन,प्रेम,धन, नाती, माणसं आणि व्यापार यांच्याबाबतीत आपला  पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. आयुष्यात कशाला महत्त्व द्यायचं आणि कशाला किंवा कुणाला दूर ठेवायचं, याची जाण येते. अपयशामुळे नव्या गोष्टी शिकतो. नव्या योजना बनवतो आणि नवे समझोतेही करतो. प्रत्येक अपयशानंतर आपण आणखी तावून-सुलाखून निघतो. खरं तर ही शिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे. जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला आता आताच अपयश आलं असेल तर तुम्हाला लगेच त्याचा काही लाभ दिसणार नाही. पण याचे महत्त्व तुम्हाला काही काळ उलटल्यानंतर कळेल.

अपयशामुळे आपल्याला चांगले अनुभव मिळतात- या अपयशामुळे पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा मिळतो तो म्हणजे अनुभव.जेव्हा आपण कुठलेही काम करण्यात अपयशी ठरतो, तेव्हा आपल्याला त्याचा अनुभव मिळतो-त्यामुळे जीवनाचा अर्थ समजून घ्यायला मदत मिळते. खरं सांगायचं तर जो अनुभव तुम्हाला तुमच्या अपयशाने मिळतो, त्याच्या इतके कुठलेच मोल नसते.

अपयशाने वाढतो आत्मविश्वास- जेव्हा आपण अपयश मागे सोडून पुढे यशाच्या दिशेने जात असतो,तेव्हा आपला आत्मविश्वासदेखील वाढत जातो. पुन्हा पुन्हा अशा परिस्थितीचा सामना केल्यानंतर कुठल्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडताना आत्मविश्वासही द्विगुणीत होतो.

अपयशाने तुमच्या जीवनाचा प्राधान्यक्रम बदलतो- एक म्हण आहे, अपयश तुम्हाला आयुष्यातून उठवते किंवा आयुष्य बनवते. या गोष्टीचं प्रमाण म्हणजे आज जे सगळे  यशस्वी लोक यशाच्या शिखरावर आहेत, त्यांनी या मार्गावरून जाताना कितीदा तरी अपयशाचे धक्के खाल्ले आहेत. पण ही यशस्वी माणसं या धक्क्यातून सावरली आहेत, उठून उभी राहिली आहेत आणि पुढे चालत राहिली आहेत. यानंतरच ते यशाच्या शिखरावर पोहचले आहेत. आज ती यशाची चव चाखत आहेत. ज्यावेळेला आपण आपल्या कामात अयशस्वी होतो, त्यावेळेला आपण आपल्या जीवनाच्या प्राथमिकतेवर विचार करायला लागतो. कशाला प्राधान्य द्यायचं या गोष्टी विचाराने ठरतात. आणि मग गरजेनुसार आपण त्यात बदल करतो. हे का करतो? कारण लवकरात लवकर आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचता यावं म्हणून...!-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment